Advertisement

देव देवाघरी परतला कै.रघुनाथराव तिडके,हिवरखेड यांच्या तेरवी निमित्ताने

देव देवाघरी परतला कै.रघुनाथराव तिडके,हिवरखेड यांच्या तेरवी निमित्ताने
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर कडुन
२० नोव्हेंबरची सकाळ उजाडली आणि अखेरपर्यंत मृत्युशी झुंज देणारे झुंजार व्यक्तिमत्व शांत झाले आणि एका दिव्यत्वाचा अंत झाला.संसारी असूनही साधुत्व जगणारे आमचे तात्या म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती होते.जिथे लक्ष्मी आणि सरस्वती गुण्यागोविंदाने नांदतात अशा तिडके कुटुंबात त्यांचा जन्म झाला.आपल्या परिश्रमाने ते कार्यकारी अभियंता या उच्च पदावर पोहचले.आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली.वारी हनुमान येथील प्रकल्पासाठी त्यांना मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी ह्यांचे हस्ते “उत्कृष्ट अभियंता” पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.या पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार त्यांना जनमाणसांनी दिला.प्रत्येक ठिकाणी त्यांची ओळख “देवमाणूस”म्हणूनच होती.
आमचे तात्या म्हणजे निगर्वी व्यक्तिमत्वाचे आगळे वेगळे उदाहरण होते.जीवनातील प्रत्येक चढउतारावर ते स्थितप्रज्ञ होते.मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ते इतरांसाठीच जगत होते.
परिवार त्यांचे मंदिर होते.परंतु त्यांचा परिवार एका चौकटीत बसणारा कधीच नव्हता.त्याची व्याप्ती संपुर्ण परिवाराइतकी व्यापक होती.संपुर्ण परिवार एकसंघ राहावा,यासाठी ते झटत होते.याशिवाय त्यांच्या परिवारात अनेक निरश्रीतांना आश्रय होता.
घरात सतत माणसांचा राबता असायचा.अनेक दुर्धर पिडीत आजारी लोकांना ते आश्रयस्थान होते.त्यांच्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले.अर्थात ह्या सगळ्या सत्कर्मात त्यांना आमच्या शालीनीकाकूंची समर्थ साथ मिळाली.
एका उच्चपदावर विराजमान असूनही त्यांनी नोकरी व कुटुंबाचा तोल यशस्वीपणे सांभाळला.अहंकाराची बाधा त्यांना कधीच झाली नाही.असे हे कुटुंबवत्सल तात्या कायम कुटुंबाच्या आदरस्थानी होते,कुटुंबाचा शिरपेच होते.
प्रेम त्यांची शक्ती होती.आयुष्यभर त्यांनी केवळ प्रेमाचीच उधळण केली.अनेक बेरोजगारांना रोजगार देऊन त्यांचे जीवन उभारून दिले.त्यांच्या अडीअडचणीत आर्थिक आधार दिला.परताव्याची अपेक्षा न ठेवता.त्यांना आत्मस्तूती कधीच आवडली नाही.
समाजात त्यांची ओळख एक दानशूर ,गरजवंताचा तारणहार,शेतकर्यांचा कैवारी,मार्गदर्शक म्हणून ओळख होती.त्यांच्या चेहर्यावर सात्वीकतेचे तेज होते.सतत हसतमुख चेहरा,ओजस्वी वाणी,प्रचंड आत्मविश्वास,साधी राहणी व उच्च विचारसरणीमुळे त्यांच्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती भारावून जायची,कधीच न विसरण्यासाठी.संसारात राहूनही संतत्व जगणारे ते खरे कर्मयोगी होते.
निवृत्तीनंतर एका सर्वसामान्य शेतकर्याप्रमाणे त्यांनी आपले जीवन व्यतीत केले.शेतीत नवतंत्रज्ञानाचे अनेक प्रयोग केले.तोटा पत्करूनही शेतात राबणार्या शेतमजूरांना ,घरातील गडीमाणसांना सन्मान दिला.त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे संसार उभे करून दिले.कर्मयोगी गाडगेबाबांच्या आदर्श दशसूत्रीचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब केल्यामुळे ते खरे कर्मयोगी ठरलेत.
असे हे संसारी राहूनही देवत्वाची प्रचिती देणारे तात्या देवरूपी ठरले.आज मृत्युनंतरही ते जनमाणसात जिवंत राहतील,यात शंका नाही.म्हणूनच म्हणावेसे वाटते की एक देवमाणूस देवाघरी परतला.

शांता-गंगा आईच्या पोटी रत्न जन्मला।
सांभाळ शेषरावांनी केला।
धन्य त्या मातापित्यांना ।
ऐसा थोर पुत्र जन्माला घातला ।

- डॅा.प्रा.इंदिरा ठाकरे-(तिडके )
अमरावती

Post a Comment

0 Comments