Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या अभय योजनेत मलकापूर नगर परिषदेचा साकल्याने विचार व्हावा मालमत्ता करा वरील मासिक शास्तीची धास्ती दूर करा : भाई अशांत वानखेडे

महाराष्ट्र शासनाच्या अभय योजनेत मलकापूर नगर परिषदेचा साकल्याने विचार व्हावा मालमत्ता करा वरील मासिक शास्तीची धास्ती दूर करा : भाई अशांत वानखेडे



मलकापूर: नगर परिषद मालमत्ता कर मुल्य निर्धारण चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्यामुळे अनेक वर्षापासुन मालमत्ता कर भरणा स्थगीत झालेला आहे. मालमत्ता करा वरील मासिक शास्त्री च्या धास्तीतून राज्य शासनाने मालमत्ता धारकांची सुटका करावी ! अशी मागणी एका पत्राद्वारे "समतेचे निळे वादळ" या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी केली आहे. याबाबत सविस्तर असे की दर मीटर प्रमाणे कर आकारणी न करता दर फुटा प्रमाणे करण्यात आलेल्या कर आकारणी मुळे कराच्या रक्कमेत भरमसाठ वाढ झाली. या प्रकरणात न्यायोचित कार्यवाही होवून मालमत्ता धारकांना दिलासा मिळेल या आशेने मालमत्ता धारकांनी कर भरणा करण्यास विलंब केला. मात्र मासिक शास्तीच्या प्रकरामुळे नगर परिषद हद्दीतील मालमत्ता धारक अधिकच अडचणित आला. महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या पटलावर या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या कर आकारणी संदर्भात व त्यावर आधारीत अव्याहत दोन टक्के मासिक शास्ती बाबत मा. आमदार एकनाथरावजी खडसे यांनी प्रश्न लावुन धरला त्यांच्या प्रयत्नाना यश प्राप्त होवून विधी मंडळात त्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात मालमत्ता धारकांची प्रतिक्षा अध्याप संपलेली नाही.. मासिक शास्तीच्या रकमेवर लावण्यात आलेल्या मासिक शास्तीमुळे नागरीक हैराण झालेले आहेत. मालमत्ता कर भरण्याची मानसिक तयारी असतांना शास्तीच्या धास्तीने ते शक्य होत नसल्याची खंत मालमत्ता धारकांमध्ये दिसुन येत आहे. कर वसुली प्रक्रियेत यामुळे खोडा निर्माण झालेला असुन न.प. उत्पन्नात प्रचंड घट निर्माण झाली असून त्यामुळे शहराचा विकास खोळंबला आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ९ जानेवारी २०२५ रोजी संपन्न बैठकीत नगर पालिका /नगर परिषदा व नगर पंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीच्या रक्कमेसंबंधी "अभय योजना" लागु करणेसाठी नगर पालिका अधिनियम सन १९६५ मध्ये बदल करण्याच्या उद्देशाने मा. आयुक्त तथा संचालक न.प. प्रशासन संचालनालय नवी मुंबई श्री. मनोज रानडे यांचे अध्यक्षते खाली समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने आपला अहवाल दि. २८ फेब्रुवारी

२०२५ पर्यंत सादर करावयाचा आहे. उपरोक्त समितीने मलकापूर नगर परिषद मालमत्ता कर निर्धारणाचा व त्यावरील दोन टक्के मासिक शास्तीचा न्यायोचित विचार करून कर निर्धारणात दुरुस्ती आणि मासिक शास्तीची रक्कम पूर्णपणे माफ करण्यासंबंधी सदर अभय योजनेत विचार होवून मालमत्ताधारकांना न्याय मिळेल व न.प. समोरील प्रश्न सुटेल याबाबत साकल्याने विचार व्हावा अशी मागणी एका पत्राद्वारे समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांच्याकडे केली असून सदर पत्राच्या प्रतिलिपी मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आमदार श्री चैनसुख संचेती, आमदार श्री एकनाथरावजी खडसे व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments