Advertisement

सुनगाव महाजल पाणीपुरवठा योजनेला लागली अखेरची घरघर.. गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद...

*सुनगाव महाजल पाणीपुरवठा योजनेला लागली अखेरची घरघर.. गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा बंद...*
जळगाव जामोद प्रतिनिधी-

सुनगाव गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या गोराळा धरण स्थित महाजल पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर लागली असून गेल्या २ महिन्यापासून एका नाल्यामध्ये पाईपलाईन फुटलेल्या अवस्थेत असून अद्यापही ग्रामपंचायत प्रशासनाने ती पाईपलाईन जोडून गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत केला नसल्याचे समजते. तसेही सुरुवातीपासूनच महाजल पाणीपुरवठा योजनेला पाईपलाईन फुटीचे ग्रहण लागलेले होते. महिन्यातून आठ ते दहा दिवस पाईपलाईन फुटून गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता.परंतु आता तर तब्बल दीड महिना उलटला असून नाल्या मधील फुटलेली पाईपलाईन ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही जोडली नसल्याचे निदर्शनात आले आहे. यामुळे संपूर्ण गावाला सहाव्या सातव्या दिवशी पाणी मिळत आहे. त्यात १४० गाव पाणीपुरवठा योजना फक्त नावालाच असून या पाणीपुरवठा योजनेचे पाणीही वेळेवर व फोर्सने येत नसल्याने एक टाकी ही भरणे कठीण आहे त्यामुळे येथील ग्रामपंचायत प्रशासनाने काही विहिरी अधिग्रहीत करून गावाला तात्पुरता पाणी साठा उपलब्ध करून दिला आहे. व गावातील पाणीपुरवठा योजनेची टाकी ही कालबाह्य झालेली असून त्यावर टाकी साफ करण्यासाठी व त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांना जीव मुठीत घेऊन टाकीवर चढावं लागते त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या टाकीमधूनही पाणी मोठ्या प्रमाणात गळत आहे.तसेच गावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गावातील नागरिकांना पोटाचे विकार उद्भवत असल्याची चर्चा डॉक्टरांकडून समजते. या पाण्यामुळे डायरिया सारख्या रोगाची साथ गावावर पसरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचा प्रश्न मार्गी लावून गावाला स्थिर व शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा ही मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. याकडे गटविकास अधिकारी यांनीही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

0 Comments