जेष्ठ नागरिकांची तिर्थाटनाची मनोकामना पूर्ण करणारी- मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना.
सुहास तिलोकचंद चवरे मलकापूर.
अंर्तमनात भक्तीभाव व परमेश्वरावर अतूट श्रध्दा असणा-या प्रत्येक मनुष्याला तिर्थाटन करावे असे मनोमन वाटते पण महागाईचा काळ व प्रापंचिक अडचणी असल्यामुळे या भाविक लोकांची मनोकामना अपुरीच राहते. तिर्थाटन करण्यासाठी कुणाजवळ पुरेसा व मुबलक पैसा नसतो. आर्थिक अडचण असते. म्हणून हे लोक श्रध्दा असूनही तिर्थयात्रेची इच्छा पूर्णत्वास नेऊ शकत नाही. याबाबतीत भाविकांची तिर्थयात्रेच्या मनोकामनेला मूर्तरुप देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक, माता-भगिनींना तिर्थयात्रेचा लाभ देणारा शासन निर्णय पारीत करुन पुण्ण्याचे वाटेकरी होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. अनेक लोक आयुष्यभर तिर्थयात्रा घडण्यासाठी प्रतिक्षा करतात पण पैश्याअभावी त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. राज्य शासन एका व्यक्तीच्या तिर्थयात्रेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यावर तब्बल 30 हजार रुपयाचा खर्च करणार आहे. राज्यशासनाने मुख्यमंत्री तिर्थ दर्शन यात्रा ही योजना कोणत्याही एका धर्मीय लोकांसाठी न करता धर्मनिरपेक्षता ठेवून सर्व धर्मीय लोकांसाठी सुरु केली आहे.
मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना निवड प्रक्रियेद्वारे लाभ देणारी योजना आहे.या योजने अंतर्गत राज्यातील एकूण 66 तिर्थांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतःचे रेशनकार्ड, आधारकार्ड, वार्षिक उत्पन्न अडीच लाख, महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्र, किंवा राज्यात जन्म झाल्याचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे. ज्या नागरिकाचे वय 65 असेल त्याला व जे 75 वर्षाचे वर आहेत त्यांना व त्यांच्यासोबत एका सहाय्यकाला या योजनेत प्रवास व जेवणाचा खर्च मोफत राहणार आहे. या योजनेत लाभार्थ्यावर किमान 30 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.
● संपूर्ण देशभरातील तिर्थक्षेत्रांचा समावेश
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातील जेष्ठ नागरिक माता-भगिनींना केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध राज्यातील तिर्थस्थळांना भेटी देता येईल. म्हणूनच ही योजना अभिनव स्वरुपाची व प्रवासाचा आनंद देणारी योजना म्हणावी लागेल.
या योजनेचा शासन निर्णय दिनांक 14 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पारीत करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेणा-या इच्छुकांनी योजनेच्या जी.आर.चे वाचन केल्यास त्यांना या योजनेची सविस्तर माहीती प्राप्त होईलच. असो एकंदरीत राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या 44 वर्षातील ही पहिलीच अनुपम योजना आहे जी सर्वधर्मिय भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारी आहे.
0 Comments