मलकापूर : अपघात घडल्यावर जखमीला उपचारार्थ तातडीने हलविण्याकरिता वेळेवर रुग्णवाहिकेची चाबी न दिसणे... रुग्णवाहिकेचा वाहक ठिकाणावर नसणे... त्याचप्रमाणे मदतीला असलेली वैद्यकीय चमू सुद्धा जागेवर उपलब्ध नसणे... असा गंभीर प्रकार एका अपघाताच्या निमित्ताने नॅशनल हायवे वरील दसरखेड टोल प्लाजा वर १६ डिसेंबर रोजी रात्री समोर आला आहे. किंबहुना या प्रकाराविरुद्ध शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी टोल प्लाजा वरील कर्मचाऱ्यांसमोर संतप्त भावना व्यक्त करीत अपघात ग्रस्त जखमींच्या मदतीकरिता नियमानुसार सज्ज करण्यात आलेली यंत्रणा जर वेळेवर उपलब्ध होत नसेल तर आम्ही शोभेची वास्तू ठरत असलेल्या रुग्णवाहिकेला ताब्यात घेऊ असा सज्जड इशारा सुद्धा दिला.
मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी आत्माराम मारोती इंगळे वय ५० वर्ष हे मलकापूर तालुक्यातील तांदुलवाडी येथून दुचाकीने नॅशनल हायवे वरून गावाकडे निघाले होते. दरम्यान दसरखेड टोल नाक्याजवळ त्यांचा दुचाकीवरून अचानक तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले ते जमिनीवर कोसळले तरी दुचाकी मात्र सरळ शंभर फूट पर्यंत धावत पुढे टोल नाक्याच्या इमारतीस धडकली. आत्माराम इंगळे जमिनीवर कोसळताच त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. ही बाब शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांना भ्रमणध्वनी वरून कळताच विजय साठे सह कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे, विष्णू महाजन,समाधान साठे व निलेश बोंडे आदींनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत या घटने संदर्भात दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांना अवगत केले. घटनास्थळी हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना टोल प्लाजा कडे उपलब्ध असलेली रुग्णवाहिका कोठे आहे? रुग्णवाहिकेचा चालक कोठे आहे त्याचप्रमाणे रुग्णवाहिकेवर असलेली वैद्यकीय चमू कोठे आहे? असे प्रश्न विचारताच रुग्णवाहिका उभी आहे परंतु चालक व वैद्यकीय चमू मात्र ठिकाणावर नाही असे उत्तर मिळताच तुम्ही रुग्णवाहिकेची चाबी द्या अशी मागणी विजय साठे यांनी करताच रुग्णवाहिका बाहेर उभी आहे परंतु रुग्णवाहीकेतीची चाबी मात्र टोल नाका इमारतीच्या रूममध्ये आहे. परंतु रूमची चाबी मात्र कोठे आहे दिसत नाही. असे बेजबाबदार उत्तर येताच विजय साठे सह असलेल्या सहकार्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत त्या रूमचे कुलूप तुम्ही तोडता की आम्ही तोडू अशी ओरड केली. त्यावेळी भेदरलेल्या कर्मचाऱ्यांनी रूमच्या शटर चे कुलूप तोडत आतून रुग्णवाहिकेची चाबी आणली याच दरम्यान रुग्णवाहिकेचा चालक हजर झाला. अशा परिस्थितीत त्या अपघातग्रस्त जखमीला रुग्णवाहिकेद्वारा उपजिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमीची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तर तिकडे टोल प्लाजा वर हजर असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. त्यामुळे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावण्यात आले.
टोल प्लाझा वरील रुग्णवाहिका व वैद्यकीय चमूचे कार्यक्षेत्र रणथम ते नांदुरा असे ५२ किलोमीटर अंतराचे असून या दरम्यान वाहनाचा अपघात झाल्यास अपघात ग्रस्त जखमींना वेळेवर उपचार मिळावा म्हणून रुग्णवाहिका व वैद्यकीय चमू मदत व सहकार्याच्या दृष्टीने सज्ज ठेवण्यात आली असते परंतु असे असतानांही ही वैद्यकीय सेवा मात्र वेळेवर ढिसाळ होऊन ढेपाळलेल्या अवस्थेत राहत असेल तर ही दुर्दैवाची बाब असून ही सेवा तातडीने नियमानुसार सज्ज न झाल्यास शोभेची वास्तू ठरत असलेली रुग्णवाहिका आम्ही ताब्यात घेऊन अपघातग्रस्त जखमींना उपचारार्थ सहकार्य करू अशी स्पष्ट भूमिका घेत हा निरोप तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा तातडीने द्या असा सज्जड इशारा विजय साठे यांनी टोल प्लाजा वरील कर्मचाऱ्यांना दिला.
0 Comments