नांदुरा (प्रतिनिधी) - निमगांव, दादगाव, नारखेड, इच्छापुर व शेलगाव मुकुंद या गावांची बससेवा बऱ्याच दिवसापासून पूर्णतः बंद आहे. सदरची बससेवा तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने १५ जानेवारी रोजी नांदुरा बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, दररोज २५०ते ३०० विद्यार्थी हे निमगांव, दादगाव, नारखेड, इच्छापुर व शेलगाव मुकुंद येथून एस.टी. बसने प्रवास करतात. एस.टी. बस बंद असल्यामुळे विद्याथ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे या गावांमधील
नागरिकांना सुध्दा एस.टी. बस बंद असल्याने नाहक खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत असून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तेव्हा सदरची बंद असलेली बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सदर बस सेवा सुरू न झाल्यास मनसेच्या वतीने वाहतूक नियंत्रक यांच्या कक्षात विद्यार्थ्यांना सोबत घेत शाळा भरविण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदन देतेवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष भागवत उगले, शहराध्यक्ष सागर जगदाळे, शाखाध्यक्ष अनंत सुशीर, अनंता बोचरे, नयन राठोड, अमोल करुतले यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments