लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं मिलन नव्हे तर दोन कुटुंबांचं मिलन. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर आयुष्यातले महत्वाचे क्षण घालवणं फक्त लग्न या संस्कारामुळेच शक्य होऊ शकतं. ही एक कमिटमेंट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. ती जपत बदलांचा स्वीकार केला तर हे नातं नक्कीच यशस्वी होत.दिनांक 26 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ खुर्द येथील मुलाचे लग्न जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील मुलीशी ठरले होते. वधू व वराकडील सर्व पाहुणे मंडळी लग्न मंडपात पोहोचली होती. परंतु नवरा मुलगाच लग्नाला हजर झाला नाही. नवऱ्या मुलाची सर्व पाहुणे मंडळी आतुरतेने दुपारपर्यंत वाट पाहत होती. दोन्ही कडील पाहुणे जवळपास 500 ते 600 लोक जमली होती. वधू मुलीच्या पित्याची घरची परिस्थिती जेमतेम होती. तरीही सर्व पाहुणे मंडळींना व गावकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु ऐन वेळेवर नवरा मुलगाच लग्नाला आला नाही. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ खुर्द येथील सतीश नारळकर या तरुणाचा विवाह जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील एका मुलीशी 26 तारखेला होणार होता. परंतु आरोपी नवरा मुलगा सतीश नारळकर व अरुण रामदास नारळकर, सत्यभामा अरुण नारळकर या तिघांनीही लग्ना अगोदर वधूकडील मंडळींना तीन लाख रुपयांची मागणी केली. पैशाची व्यवस्था करा व पैशाची व्यवस्था झाल्यानंतर आम्हाला फोन करा असे वरासह त्यांच्या आई-वडिलांनी वधू कडील मंडळींना ठणकावले होते तसेच पैशाची व्यवस्था झाल्यानंतर आम्हाला फोन करा तेव्हाच आम्ही लग्न लावण्या करिता सावरगाव येथे येतो नाहीतर येणार नाही असा दम दिला होता. वधू कडील मंडळींची तीन लाखाची व्यवस्था झाली नाही म्हणून लग्न लावण्याकरिता आरोपी वर सतीश नारळकर व त्याचे आई-वडील सावरगाव येथे लग्न मंडपात लग्न लावण्याकरिता गेले नाहीत. त्यामुळे मुलीचा विवाह थांबला होता सदर या घटनेची फिर्याद वधूचे वडील वसंता मनोहर बावस्कर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आरोपी वरासह त्याच्या आई-वडिलांवर अप नंबर 253/2024 कलम 417,420, 34 भादविसह कलम 3,4 हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पीएसआय येवले करीत आहे.
0 Comments