शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत श्रीकृष्ण सपकाळ यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नांदुरा नगर परिषदेने मालमत्ता करात केलेली अवाढव्य वाढ रद्द करुन या आधी असलेल्या मालमत्ता करावर सरसकट १० टक्के वाढ करण्यात यावी, भुमिहीन शेतमजुरांसाठी भुमिहीन शेतमजुर कल्याण महामंडळ मंजुर करावे, शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या स्व. गोपीनाथजी मुंडे अपघात विमा या योजनेमध्ये भुमिहीन शेतमजुर यांचा समावेश करावा यासह आदी मागण्या मा. तालुका अध्यक्ष मनसे तथा मा. राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना श्रीकृष्ण त्र्यंबक सपकाळ यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्या आहेत. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नगर परिषद नांदुरा यांनी मालमत्ता मोजमाप व सर्वेक्षण करुन नवीन कर आकारणीची ई- निवीदा प्रसिध्द केली आणि नगर परिषद हद्दीतील मालमत्तेचे मोजमाप व सर्वेक्षण करुन कर आकारणी करण्याचे काम ई-निवीदा ARPI ग्रुप नागपूर यांना मिळाली आणि सदर कंपनीच्या सर्वेअरनी मालमत्ता धारकांना विश्वासात न घेता नागरीकांच्या मालमत्तेचे मोजमाप करण्यात आले. परंतु मालमत्ता
धारकांच्या मालमत्तेचे जे मोजणी शिट
तयार करण्यात आली त्या मोजणी शिटवर मालमत्ता धारकांची सही
घेण्यात आली नाही. सदर कंपनीद्वारे नगर परिषद हित जोपासत नागरीकांवर अवाढव्य कराचा बोजा टाकण्यात आला. तसेच ज्यांची मालमत्ता एक मजली आहे त्यांची दुमजली दाखवण्यात आली. शासनाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची दरवाढ ही सरासरी १० टक्के अपेक्षित असते. परंतु नगर परिषद नांदुरा यांनी मालमत्ता करात केलेली अवाढव्य वाढ रद्द करुन या अगोदर असलेली मालमत्ता कर आकारणीवर सरसकट १० टक्के वाढ करण्यात यावी व नागरीकांना दिलासा देण्यात यावा. तसेच या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याण महामंडळाला मंजुरात देण्यात आली अशाच प्रकारे राज्यातील भुमिहीन शेतमजुरांच्या कल्याणासाठी भुमिहीन
शेतमजुर कल्याण महामंडळ मंजुर करण्यात यावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी स्व. गोपीनाथजी मुंडे अपघात विमा योजनेत भुमिहीन शेतमजुरांचा समावेश करण्यात यावा. उदा. शेतकरी शेतात काम करीत असतांना शेतकऱ्याला सर्पदंश झाल्यास त्या शेतकऱ्याला स्व. गोपीनाथजी मुंडे अपघात विमा मिळतो. परंतु शेतकऱ्यांच्या शेतात एक भुमिहीन शेतमजुर काम करीत असतांना सर्पदंश झाल्यास भुमिहीन शेतमजुर त्या योजनेत बसत नाही. पण शेतकरी आणि शेतमजुर हे अन्नधान्य पिकवणाऱ्या रथाचे दोन चाके असून त्या दोन चाकात शासनाकडून असलेला भेदभाव दूर करुन भुमिहीन शेतमजुरांचा स्व. गोपीनाथजी मुंडे अपघात विमा या योजनेत समावेश करुन भुमिहीन शेतमजुरांना न्याय दयावा. तसेच महाराष्ट्र राज्यात उपेक्षित असलेल्या शिंपी समाजासाठी संत नामदेव महाराज कल्याण महामंडळ मंजुर करण्यात यावे अशी मागणी श्रीकृष्ण त्र्यंबक सपकाळ यांनी केली असून वरील सर्व मागण्या विचारात घेऊन १० ऑगस्ट पर्यंत मागण्या मंजुर करण्यात याव्यात. अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
0 Comments