*जळगाव जामोद:*
*दि. 02/10/2024*
सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट अंतर्गत आज दि. 2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सातपुडा शिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये *राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री* यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अकोला जिल्ह्यातील माझोड गावचे मूळ रहिवासी व *स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन* चे प्रमुख प्रा.राजेश टाले पाटील यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले होते. प्रा.राजेश टाले पाटील हे उत्तम वक्ते असून त्यांची युवा व्याख्याते म्हणून ख्याती आहे, युवाशक्ती व राष्ट्रशक्ती या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रभर व्याख्याने, कार्यशाळा, विविध शिबिरांमधून वैचारिक व प्रेरणात्मक मार्गदर्शन केले आहे.
प्रा.राजेश टाले यांच्या युवाशक्ती व राष्ट्रशक्ती या प्रबोधनपर मार्गदर्शनातून युवक हा राष्ट्राच्या निर्मितीमध्ये व प्रगतीमध्ये किती महत्त्वाचा घटक आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, हाच मुख्य उद्देश आजच्या कार्यक्रमाचा होता. जीवनातील विविध घटनांचा संदर्भ देत बाल अवस्थेपासून तर वृद्धापकाळापर्यंत जीवनाचा सार त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय उत्तम पद्धतीने मांडला. युवाशक्ती जर एकवटली तर ते राष्ट्र निर्माण आणि प्रगतीमध्ये किती प्रभावशाली होऊ शकते, याकरिता स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील दाखले सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रबोधनपर मार्गदर्शनातून दिले. त्याकरिता आजच्या आधुनिक जीवनात महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी जल्लोषात साजरा करण्यापेक्षा महापुरुषांचे विचार व कृती अंगीकारने गरजेचे आहे आणि याच माध्यमातून एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या पिढीच्या माध्यमातून घडेल आणि तेच व्यक्तिमत्व राष्ट्राच्या व समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. वाचन हे अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी माध्यम असून वाचनामुळे प्रत्येकाच्या विचारसरणीला योग्य दिशा व चालना मिळते, म्हणून उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांनी वाचन कौशल्य जपणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा.राजेश टाले यांनी प्रबोधनातून व्यक्त केले.
युवाशक्ती व राष्ट्रशक्ती या प्रबोधनपर कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल तायडे तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राहुल तायडे हे सुद्धा उपस्थित होते. तिन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास कसा अग्रेसर होऊ शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तिन्ही महाविद्यालयातून जवळपास 600 विद्यार्थी तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. तीनही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, डॉ.अनिकेत उमाळे, प्रा.दत्ता तायडे आणि स्वागत समितीच्या सर्वच सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन केले होते, त्यामुळेच कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जिव्हेश साळी यांनी उत्कृष्टपणे केले तर आभार प्रदर्शन प्रा.सचिन शिंगणे यांनी केले.
0 Comments