चिखली येथील विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींची घेतली भेट चिखली येथील शासकीय वसतिगृहातील सहा विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची भेट घेत विचारपूस केली. तसेच दोषींवर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील सर्वच शासकीय वसतीगृहातील स्वयंपाकघरांची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.संदीपदादा शेळके म्हणाले, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी शासकीय वसतीगृहात शिकतात. शासनाकडून या विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी सुविधा पुरवल्या जातात. मात्र या सोयींचा लाभ त्यांना मिळत नाही. त्यामुळे असे प्रकार घडतात. चिखली येथील वसतीगृहातील विद्यार्थिनींना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येत होते. त्यामधून त्यांना विषबाधा झाली. चिखलीच्या वसतीगृहात जर असा प्रकार सुरु असेल तर मग जिल्ह्यातील इतर शासकीय वसतीगृहामधील परिस्थितीची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे. सामाजिक न्याय विभागाने याबाबत तातडीने पावले उचलावीत. म्हणजे पुन्हा कुठल्या तरी वसतीगृहात असा प्रकार घडणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला..
0 Comments