जळगांव जामोद:-यलो मोझँक व्हायरस मूळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांचे हेक्टरी ५० हजार रु मदत द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या वर्षी नवीन ‘येलो मोझॅक व्हायरस’ मुळे ऐन शेंगधरणीच्या काळात सोयाबीनची झाडे पिवळी पडून वाळत आहे. गेल्या काही वर्षांपासून संकटाचा सामना करणारे शेतकरी येलो मोझॅकच्या आक्रमणामुळे पुन्हा संकटात सापडले आहे. या कीडीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या व्हायरसने केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे. या तीन राज्यांत सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वातावरणात निर्माण झालेल्या उष्ण आणि दमट वातावरणाने सोयाबीनवर हा व्हायरस आल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या व्हायरसमुळे सोयाबीनचे पीक अचानक वाळत आहे. त्याला किडीसह आतमधून पोखरले गेले आहे. सोयाबीन पिवळे आणि काळेही पडत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेंगावर काळे ठिपके आहेत. पानावरही डाग पडत आहेत. यातून शेंगा वेळेपूर्वी वाळत असल्याने शेंगा भरण्याचे प्रमाण थांबले आहे. या खरीप हंगामात अर्ली व्हेरायटी सोडून सोयाबीनच्या इतर व्हेरायटींवर मोठया प्रमाणात ‘येलो मोझॅक’ चे आक्रमण झाले आहे. या कीडीचा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. सोयाबीनचे उत्पादन घटले तर याचा थेट परिणाम दरावरसुद्धा होणार असल्याने शेतकरी खचला आहे. कापसावर लाल्या रोग आल्यास ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते त्याच धर्तीवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी. सरकारने तातडीने पंचनामे करुन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्या अश्या प्रकारची मागणी निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी जळगांव (जा) च्या वतीने करण्यात आली निवेदन देते वेळी रतन नाईक मा.ता.अध्यक्ष सुनिल बोदडे ता.उपाध्यक्ष, प्रकाश भिसे युवा नेते, विजय सातव, ता.महासचिव ज्ञानेश्वर कोकाटे, ता उपाध्यक्ष विजय तायडे, आनंदा गवई, अमोल तायडे, संतोष पवार इ. उपस्थित होते.
0 Comments